मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. ढगांच्या गडगडाटासह वीजा चमकल्याने काही ठिकाणी वातावरण अधिकच भयावह होण्याची शक्यता आहे. सोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
- ३१ मार्च २०२५ रोजी: पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाट माथ्यांवर हलक्या पावसाची शक्यता आहे.
- १ एप्रिल २०२५ रोजी : ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून तापमान वाढले आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा स्थितीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. कोकणात काढणी केलेला आंबा, काजू बी, कडधान्ये आणि सुपारी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या मालाची योग्य ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान अस्थिर राहणार आहे. हवामान विभागाच्या सततच्या निरीक्षणानुसार परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी.