राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाला शेतकर्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. या वाणाचे बियाणे शेतकर्यांनी आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रावर आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांवर ‘फुले समर्थ’ या वाणाचे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
तसेच कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, कृषी संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर व कृषी संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा या ठिकाणीसुध्दा फुले समर्थ या वाणाची विक्री सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच सदरचे कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने संशोधन केलेल्या सोयाबीनच्या विविध वाणांनासुध्दा शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यादृष्टीने विद्यापीठाने फुले संगम (केडीएस 726) या वाणाचे प्रमाणीत बियाणे दि. 22 जून, पासून विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठातील बियाणे विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी केले आहे.