Saturday, July 27, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीचा संगमनेरात मोर्चा

महाविकास आघाडीचा संगमनेरात मोर्चा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मेट्रो आणि स्मार्ट सिटी कडे लक्ष देणार्‍या या सरकारचे शेतकर्‍यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisement -

संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, शिवसेनेचे अमर कातारी, नवनाथ अरगडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर, सौ. मीराताई शेटे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, कांद्याचा प्रश्न सध्या मोठा अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक उभारतो. मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. या अडचणीच्या काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार व आघाडी सरकारने कायम शेतकर्‍यांना मदत केली आहे. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकर्‍याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेड कडून कुठेही खरेदी सुरू नाही. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, वांगे, कांदे सर्व पिकांचे भाव पडले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे.

याचबरोबर सध्या उन्हाळा वाढत असून सरकारकडून शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस होते. त्यावेळी हेच भाजपवाले मोफत विजेच्या घोषणा देत होते. आता मोफत वीज करून त्यांनी शेतकर्‍यांना दिलासा दिला पाहिजे.

राज्यातील जनता ही शिंदे-फडणवीस सरकारला कंटाळली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसब्यातून बदलाचे वारे सुरू झाले आहे. 2024 मध्ये संपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळेल तसेच जिल्ह्यातही शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी काही मंडळी जिरवा जिरवीचे राजकारण करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विधानसभेतही आपण आवाज उठवू. विधानसभेतील आवाज आणि जनतेचा रस्त्यावरील एकत्र मिळून सरकारला चांगले निर्णय घ्यायला भाग पाडू असेही आमदार थोरात यावेळी म्हणाले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, शिवाजी जगताप, निर्मलाताई गुंजाळ, बाबले महाराज, जावेद शेख, माजी सैनिक रायभान पवार, विष्णुपंत रहाटळ यासह शेतकर्‍यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी सुरेश थोरात, नवनाथ महाराज आंधळे, आनंद वर्पे, सुभाष सांगळे, सौ. उगलमुगले, संतोष हासे, रामदास वाघ, प्रा. बाबा खरात, निखिल पापडेजा आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कांद्याला हमीभाव द्या, शिंदे सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणांनी संगमनेर बसस्थानक परिसर दुमदुमून गेला. यानंतर शासकीय अधिकार्‍यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जनतेच्या हिताची कामे करावी

सत्ता येते आणि जाते मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या काही लोकांकडून जिरवा जिरवीचे राजकारण सुरू आहे. गरीब आणि निरपराधांना त्रास देऊ नका. अधिकार्‍यांनी न्याय भूमिकेने वागावे. जिरवा जिरवीचे राजकारण करणार्‍यांची जनताच जिरवेल, असा टोलाही आमदार थोरात यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या