Thursday, September 19, 2024
Homeराजकीयमहायुतीत वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचा थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा… कारण काय?

महायुतीत वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचा थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा… कारण काय?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

“राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात”, वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते.

दरम्यान, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आक्रमक झाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभेआधी महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : खा. अमोल कोल्हेंना मोबाईलवरून शिवीगाळ; संगमनेरातून महसूल कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तीमत्व आहे. शुन्यातून विश्व निर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा. पण त्यांची अशी ही वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाट वाटते.

ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, आपण स्वाभिमानी आहोत. आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू, असं उमेश पाटील म्हणाले.

हे ही वाचा : काँग्रेसला धक्का! आणखी एक आमदार होणार भाजपावासी

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा अपमान करत असतील, महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हे ठरवावे लागेल. तानाजी सावंत यांच्या व्यक्तव्यावर मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट प्रमाणेच एक बैठक घ्यावी. दररोज कोणीतरी उठून उभा राहतो, आधी नितेश राणे, सदाभाऊ खोत आता तर तानाजी सावंत बोलले. तानाजी सावंत यांचा साखर कारखान्याच्या उद्घाटनाला पवार चालतात. तेव्हा मळमळ नव्हती का राष्ट्रवादीची? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते.

हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या