मुंबई | Mumbai
मालेगाव शहरातील (Malegaon City) भिक्कू चौकात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची पुरव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज (गुरुवारी) विशेष एनआयए न्यायाधीश ए.के. लाहोटी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर आता यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले की, “पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर झाला. त्याचे ठिकाणही आहे. या स्फोटात लोकांचाही मृत्यू झाला. जर बॉम्बस्फोट झाला तर त्यातील आरोपी गेले कुठे या स्वाभाविक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्यांना पकडले जाणे, त्यांना शिक्षा होणे या दृष्टीने सरकार पुढे काय करणार हा प्रश्न आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासारखा अधिकारी ज्यांना २६/११ ला देशावर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले होते, त्याचे पुढे काय झाले. त्यामुळे आता स्फोटातील आरोपींना शोधले पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे असे, त्यांनी सांगितले.
तर माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) म्हणाले की, “तत्कालीन पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद समोर आला होता. दहशत निर्माण करण्यासाठी हे केलं गेलं होते. मात्र, आरोपी निर्दोष होत असतील, तर यामागे कोण होतं? साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? या प्रकरणात लष्करी अधिकाऱ्याला सुद्धा अडकवण्यात आले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील (Case) सर्व आरोपी निर्दोष सुटले असतील तर मग दोषी कोण आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
न्यायाधीश लोहोटी काय म्हणाले?
एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश लोहोटी निकालाचे वाचन करतांना म्हणाले की, “बॉम्बस्फोट झाला त्याठिकाणचा पंचनामा योग्य नाही. तसेच आरडीएक्स बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. फक्त संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असेही न्यायाधीशांनी म्हटले. तसेच जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असे निरिक्षणही यावेळी त्यांनी नोंदवले. तसेच दुचाकीचा चेसी नंबर देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही. तसेच आरोपींना आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक आहेत. बॉम्बस्फोटात जे जखमी झाले किंवा मृत्यू झाले ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे”, असेही निरीक्षण न्यायाधीशींनी नोंदवले .
या आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ऊर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवादविरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला होता. मात्र आता त्यांची या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले होते.
२००८ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजान पर्वानिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना २९ सप्टेंबर २००८ मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात ६ जण ठार तर शंभराहून अधिक महिला-नागरीक जखमी झाले होते. रात्री ९ वाजून ३५ मिनीटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतप्त झाले होते.
या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.एकूण ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. त्यानंतर आज या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.





