मन झालं बाजिंद या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. मालिकेतील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता वैभव चव्हाण हा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेविषयी साधलेला हा खास संवाद…
१. तुझ्या मते बाजिंद म्हणजे काय?
माझ्या मते बाजिंद म्हणजे लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्व.
२. तुझ्या व्यक्तिरेखे बद्दल सांग
मी या मालिकेत रायाची भूमिका साकारतोय जो हळदीच्या कारखान्याचा मालक आहे आणि स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने राया स्वतःच्या पायावर उभा आहे आणि त्याने नाव आणि सन्मान मिळवला आहे. तो खूप जिद्दी आहे आणि रायाच्या व्यक्तिमत्वावरूनच या मालिकेचं नाव बाजिंद असं पडलं आहे.
३. या व्यक्तिरेखेसाठीची तुझी तयारी कशी होती?
रायाची व्यक्तिरेखा हि माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. रायाची वागणं, बोलणं, चालणं हे खूप वेगळं आहे त्यामुळे त्याकडे मी खूप लक्ष दिलं. राया हा खूप बिनधास्त आहे आणि उधळण करणारा आहे. प्रत्येक आईला राया सारखा मुलगा हवा, प्रत्येक तरुणाला राया सारखा मित्र, रायासारखी प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी अशी ही प्रत्येकाला हवीहवीशी आणि आपलीशी वाटणारी भूमिका आहे. हि भूमिका चोख निभावण्यासाठी मी स्वतःमध्ये देखील बदल केले. तसेच राया आणि माझ्यामध्ये साम्य असं आहे कि मी स्वतः शेतकरी आणि गावाकडचा आहे त्यामुळे रायाच्या व्यक्तिमत्वातील पैलू मला आत्मसात करणं सोपं गेलं.
५. निवड कशी झाली?
मला अभिनयाची गोडी आधीपासूनच आहे. मी एक चांगल्या संधीची वाट बघत होतो त्यामुळे मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिले होते. अशा वेळी मला या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि या मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ यांना माझा रांगडा लुक आवडला जो राया या व्यक्तिरेखेसाठी अपेक्षित होता. तसंच त्यांना माझं ऑडिशनसुद्धा आवडलं आणि अशा प्रकारे माझी मालिकेसाठी निवड झाली.
६. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच मालिकेची खूप चर्चा आहे, तुम्हाला प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
मी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका निभावतोय ही मी आधी कोणालाच सांगितलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा मालिकेचा प्रोमो रिलीज झाला तेव्हा माझ्या ओळखीतील सगळ्यांसाठीच हे खूप मोठं सरप्राईज होतं. तसंच मालिकेत दाखवण्यात आलेला पिवळा रंग, मालिकेचं नाव, बाजींद शब्दाचा अर्थ, प्रोमो मधील बॅकग्राउंड म्युजिक या सगळ्याची चर्चा प्रोमोज रिलीज झाल्यापासूनच होतं होती. त्यावरून आम्हाला प्रेक्षकांची उत्सुकता दिसत होती आणि त्यांची मालिकेसाठीची आतुरता पाहून आम्हाला खूप छान वाटलं होतं.