जालना | Jalana
राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर सरकारने काढला आहे. हा जीआर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी लातूर जिल्ह्यातील वांगदरी गावात जाऊन ओबीसी आरक्षणाच्या लढाईत आपला जीव दिलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, ओबीसी बांधवांना आवाहन करत कुणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, आधी आम्ही संपू, नंतर तुम्ही काय करायचे ते करा, असे म्हटले. तसेच, आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ आपल्या बांधवावार आल्याचेही भुजबळ यांनी म्हटले होते. आता, छगन भुजबळांच्या लातूर दौऱ्यासंदर्भात बोलताना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
भुजबळ यांनी मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला दिलेले स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नकोय का? ते रद्द करायचे का? ते रद्द झाले तर ईडब्ल्यूएसमध्ये ही तुम्हाला आरक्षण आहे ते पण तुम्हाला नकोच का? याचे उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रातही मराठा समाजाचे मंत्री होते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा आहे. ज्याला काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहिती नाही, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, ह्याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे. तो आता अंधश्रद्धा बाळगत आहे, असा पलटवार केला. तसेच, ह्याला तिकडं नेपाळ, नागालँडमध्ये सोडायला हवं, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचे आहे का?
तू 32 टक्के खातो असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचे आरक्षण खाल्ले आहे ते आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षण रद्द करायचे आहे का? तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचे आहे का? तू प्रगत झाला आहे. तू ते आरक्षण सोड ना. तुझे अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळे यानेच खाल्ले आहे. राजकारणापायी हे ओबीसींना उलटे समजाऊन सांगत आहे. याचे ऐकू नका, हा मेटाकुटीला आला आहे. डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे, याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यत मिळवलं
पुढे जरांगे म्हणाले, याला देवाने अक्कल दिली असती तर बरे झाले असते, मुंबईत मराठ्यांची पोरं गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली, मुंबईचे खरे मालक ही पोरं होते, तिथले लोक पाहुणे आहेत. ह्यो इथं शोभत नाही, ह्या जनावराला नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवं, ह्याला नागालँड, इंग्लड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला. तसेच, महाज्योतीला यापूर्वी हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? सारथीला आता कुठे यायला लागले आहेत. वेडा वाकडा जीआर यानेच 1994 साली काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यत मिळवलं आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





