कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
मागील 70 वर्षांपासूनच्या सरकारचे पाप आम्हाला भोगायची वेळ आली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील आंदोलनाची दिशा 22 रोजी जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांची 9 ऑक्टोबर रोजी येवला येथे जाहीर सभा झाली. सभेच्या वेळी जेसीबीवरून फुले उधळताना काही कार्यकर्ते खाली कोसळले. त्यातील जखमी गोकुळ रावसाहेब कदम यास कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी जरांगे कोपरगावात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. सरकारला अजून किती बळी घ्यायचे आहेत, हे सांगता येणार नाही. मात्र 24 तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जे जखमी झालेत त्यांच्या वेदना वाया जाऊ द्यायच्या नाहीत. आम्हाला आरक्षण दिल्यास वेदना सहन करण्याची वेळ येणार नाही. मागील 70 वर्षांपासूनच्या सरकारचे पाप आम्हाला भोगायची वेळ आली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील आंदोलनाची दिशा 22 रोजी जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.