मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी आता मुंबईला (Mumbai) येण्याची भाषा सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण (Reservation) आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्याकांड प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीकेचे आसूड ओढताना दिसत आहेत. त्यातच आता जरांगे यांनी आरक्षणाची लढाई ही आता फायनल मॅच असणार असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, “यापुढे आता कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, पण करून दाखवायचे आहे. येथून पुढे सरकारची (Government) चाल खेळावी लागणार आहे. सरकार सुद्धा निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन (Protest) करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही”, अशी टीका त्यांनी केली. तसेच आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे होते आणि ओबीसींचा कायदा दुरुस्त करायचा असला तर त्याची अधिसूचना काढावी लागते. त्यावेळी त्यांनी अधिसूचना काढण्यास विलंब केला. त्यामुळे तिथे आमची फसवणूक झाली, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.
पुढे ते म्हणाले की, ” आरक्षणाची लढाई ही आता फायनल मॅच (Final Match) असणार आहे. तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊन राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. मी आरक्षण मागत असून मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही आमच्या आरक्षणाला (Reservation) विरोध करत आहात, म्हणजे तुम्हीच जातीवादी आहात. १०० टक्के सरकारकडून फसवणूक (Fraud) झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणे गरजेचे होते”, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.