मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ५ किंवा ६ नोव्हेंबरला भेटीची वेळ मागितली आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत.
मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.