मुंबई | Mumbai
मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून देखील हालचाली केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची (Manoj Jarange) भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंदोलनातील मागण्या राज्य सरकारच्यावतीने मान्य केल्या.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पाच मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले. त्यातील सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या. यानंतर मनोज जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपण उपोषण सोडत असल्याची घोषणा केली.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण (Hunger Strike) सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर ‘उपोषण सोडण्यासाठी या, तुमचं आमचं वैर संपलं असे म्हटले. मात्र, ही घोषणा केल्यानंतर काही क्षणातच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे यांनी उपोषण सोडले.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सुरु असलेले उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे दिसले. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मी आता रुग्णालयात (Hospital) जाणार आहे असेहीही त्यांना सांगितले. यावेळी उपोषण सोडल्यानंतर मराठा आंदोलकांनी गुलालाची उधळण केली. तसेच गणपतीची आरतीही करण्यात आली. तर मराठा आरक्षण उपसमितीनेही मराठा समाजाचे आभार मानले.




