मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे शुक्रवार (दि.२९) पासून मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक देखील मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र,सरकारकडून गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आज आंदोलकांनी बीएमसी समोरचा रस्ता अडवून धरला आहे.
आज (शनिवारी) सकाळी मराठा आंदोलक (Maratha Agitators) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अनेक बस आणि टॅक्सी गेल्या तासाभरापासून येथे अडकून पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरुन हटवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, डीसीपी प्रवीण मुंडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यांनी अजूनही सीएसएमटीचा रस्ता रोखून धरला आहे. काही आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंघोळ केली. त्यामुळे या परिसरात सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. तसेच प्रशासनाने शीघ्र कृती दल (Rapid Action Force) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची तुकडी रस्त्यावर उतरवली आहे.
आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल्स, खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद
कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली काल (शक्रवारी) बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आजही या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद आहेत.
बीएमसी आणि सीएसएमटी परिसरात आंदोलक एकवटले
बीएमसी आणि सीएसएमटी परिसरात आंदोलक एकवटले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.





