छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले आहे. आमचा डीएनए ओबीसीचाच आहे. आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो नाही तर आम्ही आधीपासून होतो, तुम्हीच 1990 नंतर घुसलेले आहात, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. तर मराठा समाजाला मिळणारे आरक्षण सरसकटच आहे. आता येवल्यावाला कोर्टात गेला तरी काहीही होणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणत आहेत की, सरसकट आरक्षण दिलेले नाही, फक्त पुराव्यांच्या आधाराचा जीआर आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, आता मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्यांनी हैदराबाद गॅझेटचा जीआर दिलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आरक्षणात गेले आहेत. त्याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ गरीब मराठ्यांना समजतो. आमचा उद्देश फक्त एकच होता. गरीब मराठ्यांसाठी, गरीब मराठा लढत होता आणि तो जिंकला आहे. ५८ लाख नोंदीद्वारे तीन कोटी मराठा आधीच आरक्षणात घातले आहेत. आता हैदराबाद गॅझेट झाले आहे, त्याचा जीआर निघाला आहे, त्यामुळे मराठवाड्यातील मराठा आरक्षणात गेला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
सध्या राऊत तिकडूनच लईच बोलायला लागले
जीआरमधील त्रुटी मान्य आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी त्रुटी असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसेच त्यामध्ये दुरुस्त करू, असे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले की, एवढी बार जाऊ द्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं. दुसरं कुणीही हाताळला नाही. सध्या राऊत तिकडून लईच बोलायला लागले आहेत. उपोषण आम्ही कारायच आणि श्रेय यांना का द्यायचं, असे ते म्हणाले.
आम्ही ओबीसीत गेलो नसून ते आमच्यात आले
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर ते म्हणाले की, यावरूनच मराठ्यांनी ओळखायचे की मराठे जिंकले आहेत. छगन भुजबळ यांच्या घुसखोरी वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, याला घुसखोरी म्हणता येणार नाही, याला अधिकृत म्हणतात. मराठा समाज अधिकृतपणे आरक्षणात जाण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळ यांना पक्के माहिती होते हे आरक्षण घेणार म्हणून. भुजबळ ओबीसी नेते असल्याची ओळख मिटू देणार नाही. तो टेकला तरी त्याच्या अंगातील खोड जाणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. भुजबळला जीआर चांगला कळतो. कारण त्याने कॅबिनेट हाताळली, तीन चार पक्ष हाताळल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही ओबीसीत गेलो नसून ते आमच्यात आले, आम्ही पूर्वीचे आहोत, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
ओबीसीमध्ये वाटेकरी वाढलेले नाहीत, असे सांगत ते म्हणाले की, आमच्या पूर्वजांचे मन मोठे होते म्हणून तेव्हा त्यांनी आरक्षण घेतले नाही आणि ओबीसींना दिले. आम्ही १८८१ ते आतापर्यंत आरक्षणात होतो. भुजबळ हे 1989 ला आरक्षणात आले. आम्ही पूर्वीचेच आहोत. आम्हाला आता लक्षात आले की, आमच्या मुलाबाळांसाठी आरक्षण गरजेचे आहे, म्हणून आम्ही ते मिळवले आहे, असेही भुजबळांचा उल्लेख टाळून जरांगे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





