Sunday, May 19, 2024
Homeनगरसर्वसामान्य मराठ्यांनी लढा हातात घेतल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही

सर्वसामान्य मराठ्यांनी लढा हातात घेतल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गरजवंत मराठ्यांनी, शेतकर्‍यांच्या मुलांनी व सर्वसामान्य मराठ्यांनी आरक्षणाचा लढा हातात घेतल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, गेली 75 वर्षे सर्वच पक्षातील इतर जातींच्या नेत्यांची प्रतिष्ठा व मान सन्मान वाढविण्यासाठी मराठा समाजाने कसरत केली आहे. मात्र, याच समाजातील नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित करून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला.

- Advertisement -

राहुरी येथे मराठा एकिकरण समितीच्यावतीने आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. काल सकाळी जरांगे पाटील यांचे राहुरी येथे बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आ. प्राजक्त तनपुरे व युवानेते हर्ष तनपुरे यांनी स्वागत केले. त्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली व वाजत-गाजत त्यांना सभास्थळी नेण्यात आले.

जरांगे पाटील म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतु आजपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रात संख्येने जास्त असलेला मराठा समाज सर्वांच्या मदतीला धावून जातो. मराठा गरीब, मागास व शेतकरी असून समाजाला आरक्षण नाही. गेल्या 75 वर्षांपासून आमच्या पुर्वजांनी सर्वच पक्षातील इतर जातींच्या नेत्यांची मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्यावर वेळ आली होती तेव्हा कोणताही जातीचा भेदभाव न करता त्यांचा राजकिय प्रवास वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला. आज आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना हे मात्र आता आरक्षणाला विरोध करीत आहे. मराठा समाजाने तुम्हाला कधीच परके मानले नाही. परंतु तुम्ही मराठा समाजाला कधीच आपले मानत नव्हते हे आता उघड झाले आहे.

महाराष्ट्रातील काही भागात मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळत आहे. मात्र इतर भागात नोंदी नसल्याने ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यासाठी राज्यातील सर्वच मराठा बांधवाना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी हा लढा सुरू आहे. भारत देशात मराठा हि एकमेव जात मागास म्हणून सिध्द झाली आहे. इतर कोणतीही जात मागास म्हणून सिध्द झालेली नसताना त्यांना आरक्षण दिले आहे. ओबीसी जातीची जणगणना केल्यास अनेक जाती मागास सिद्ध होणार नाही. मंडल आयोगाने कोणतीही जनगणना न करता ओबीसी आरक्षण दिले. मराठा समाज मागास असताना सरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हलगर्जीपणा केला. आयोगाने इतर ओबीसी जातींच्या पोटजातींनाही ओबीसीत समाविष्ट करून घेतले. मात्र, मराठा समाज हा कुणबी असूनही कुणबीची मराठा ही पोटजात म्हणून का मराठा आरक्षण दिले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आंतरवली येथे लोकशाहीच्या मार्गाने आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना निष्पाप समाजाच्या माता भगिनीवर सरकारने लाठीहल्ला केला. हा हल्ला आंतरवलीच्या ग्रामस्थांवर नव्हता तो अखंड मराठा समाजावर केलेला हल्ला होता. सरकारने आरक्षणासाठी जी समिती गठीत केली त्या समितीला हैदराबादला जवळपास 5 हजार पुरावे सापडले आहे. सरकारने आपल्याकडून 30 दिवसांची मुदत मागीतली होती. आपण त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. 30 दिवसांची मुदत येत्या 14 ऑक्टोबरला संपत आली असून त्यादिवशी आंतरवली येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिशा ठरविण्यासाठी जाहिर महासभेचे आयोजन केले असून या महासभेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठा एकिकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे यांनी केले तर आभार संभाजीराजे प्रतिष्ठाणचे राजेंद्र शेटे यांनी मानले. यावेळी हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या