मुंबई | Mumbai
मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी चौथ्या दिवसापासून पाणीसुद्धा त्याग करण्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे हायकोर्टाने आंदोलकांना (Protest) संपूर्ण रस्ते खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
तर दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची (Maratha Reservation Sub-Committee) बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर थोड्याच वेळात उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मराठा आंदोलकांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तसेच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. मनोज जरांगे पाटील यांचा आदेश येईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, असे आंदोलकांनी म्हटले.




