अहमदनगर (प्रतिनिधी) – औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये 6 मार्चला मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची व 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात एका 35 ते 40 वर्षीय मृत महिलेची ओळख एमआयडीसी पोलिसांना अद्याप पटलेली नाही. ओळख न पटल्याने खुनाचे कारण, मारेकरी या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळणे अवघड झाले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहेत.
औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतामध्ये 6 मार्चला 25 ते 30 वर्षे वय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाच्या डोक्यावर व शरिरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर त्या तरुणाचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप एमआयडीसी पोलिसांना या तरुणाची ओळख पटविण्यात यश आले नाही.
तसेच 7 जूनला निंबळक बायपास जवळील काटवनात एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात ओढणीने गळा दाबल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महिलेची ओळख पटली नसल्याने खुनाचे गूढ उकलले नाही. महिलेची ओळख पटविण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरील पोलीस ठाण्यात मिसिंग केस तपासल्या गेल्या. वृत्तपत्रातून महिलेचे वर्णन प्रसिद्ध केले गेले. एमआयडीसी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु अद्यापही या महिलेची ओळख पटलेली नाही. दोन्ही मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे मारेकरी कोण, हा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
– अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण