Sunday, October 6, 2024
Homeनगरप्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास दुधाला 35 रुपये भाव देणे शक्य

प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास दुधाला 35 रुपये भाव देणे शक्य

20 लाख लिटर दुधाचे संकलन करण्याचे आवाहन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना 35 रुपये भाव देणे शक्य होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने दूध दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्यात तातडीने लागू करता यावा यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यासह बाहेरच्या राज्यात जाणार्‍या दुधाला सुध्दा शासनाने लागू केलेले दर मिळावेत यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अमुल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरूज येथील युनियनचे प्रतिनिधी यांच्यासह दूग्ध विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड व आधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी या सर्व प्रतिनिधींशी संवाद साधताना दूध उत्पादक शेतकर्‍यांना 3-5, 8-5 फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला 35 रूपयांचा दर लागू करावा असे आवाहन केले. दर लागू करण्यासाठी काही अडचणी असल्यास विभागाकडून सोडविण्यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

ज्याप्रमाणे राज्यातील प्रक्रिया केंद्राना दूध पावडर उत्पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्यानंतर याबाबत सरकार सकारात्मकतेने विचार करेल असे त्यांनी सांगितले.
सद्य परिस्थितीत राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी प्रक्रिया केंद्रानी 20 लाख लिटर दूधाचे संकलन करण्यासाठी सहकार्य करावे, त्यामुळे शेतकर्‍यांच्या दूधाचा प्रश्न मार्गी लागला जाईल. यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दूधाला हमीभाव मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आपण व्यक्तिगत भेट घेवून याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले. राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशिल असून, दूधाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल असेच प्रयत्न केले जात आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्याचे काम सुरू असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या