Friday, May 3, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत - जयंत पाटील

केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत – जयंत पाटील

पुणे |प्रतिनिधि| Pune

केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत. राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली.दरम्यान, गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. हे अपयश लपवण्यासाठी, चुका दडवण्यासाठी भाजप इव्हेंट करत आहे असेही ते म्हणाले.

- Advertisement -

100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावर जयंत पाटील यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली.

जयंत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे, पण त्या त्यांच्या आहेत की नाही, हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे, असेही पाटील म्हणाले. मुळात भाजपला टोकाचा विरोध करून राष्ट्रवादी सत्तेत आहे, हेच भाजपला रुचत नाही, सर्व मार्गाने त्रास देणे, हे भाजपने पूर्णपणे ठरवले आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आहेत, त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला, तो देश सोडून पळून गेला. जेथे पैशाची देवाण घेवाण झाली नाही, तिथे अटक करणे म्हणजे बदला घेणे आहे, वचपा काढणे आहे, एखाद्याला राजकीय दृष्ट्या संपवण्याचे काम आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.निवडणूक झाल्या तर 105 वरून भाजप 40 जागांवर येईलआज देगलूर पोटनिवडणुकीचा निकालात भाजपची कशी धूळधाण झाली, हे सगळे पाहत आहेत. त्यामुळे, निवडणुकांना आम्ही घाबरत नाही. पुन्हा निवडणूक घेतली तर चंद्रकांत पाटलांचे 105 होते ते 40 वर येतील, असा टोलाही पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या