राहाता |प्रतिनिधी| Rahata
आषाढी वारी (Ashadhi Wari) हा जगाच्या पाठीवरील एक अद्भुत सोहळा आहे, आणि शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात येणार्या लाखो भाविकांसाठी सुखाचा क्षण असल्याची भावना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे पहाटे दर्शन (Vitthal and Rukmini Darshan) घेतले. दरवर्षी आषाढी एकादशीला पांडूरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विखे पाटील कुटुंब पंढरपूरात जातात. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासून सुरू असलेली परंपरा मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी पुढे सुरू ठेवली आहे.
मनोभावे दर्शन घेतल्यानंतर ना. विखे पाटील म्हणाले, आषाढी वारीचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. वारीच्या मंगलमयी पर्वाच्या निमित्ताने शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पंढरपूरात लाखो भाविकांचे पांडूरंगाच्या श्रद्धेपोटी येणे म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अद्भुत सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.
शेकडो वर्षांची परंपरा या वारीला आहे. राज्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आत्मा म्हणून वारकरी सांप्रदायाने वारीचे महत्त्व अधोरेखीत करून ठेवले आहे. विठ्ठलाच्या समोर नतमस्तक होण्याचे भाग्य मिळणे म्हणजे परमोच्च सुखाचा क्षण असतो. प्रत्येकजण यासाठीच पंढरीत येण्यासाठी आसुसलेला असतो. सर्व दुःख विसरून माउलीच्या दर्शनातच सुखाचा क्षण लाखो भक्त शोधत असल्याचे विखे पाटील म्हणाले.





