मुंबई । Mumbai
राज्यात मागील काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हुंडाबळी प्रकरण चांगलेच गाजत आहे.सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने आणि वारंवार पैशांची मागणी केल्याच्या कारणातून २३ वर्षीय वैष्णवीने आपले आयुष्य संपवले. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकूण दहा जणांना अटक केली आहे.
ही घटना ताजी असताना आता राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने एका वकिलामार्फत तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच इम्तियाज जलील यांनी महिला आयोगाला देखील सवाल केला आहे.
इम्तियाज जलील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का बसले आहेत? आम्ही असं केलं असतं तर अख्खा मीडिया घरासमोर जमला असता. महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की, तुम्ही आताही गप्प बसणार आहात का? रुपाली चाकणकर ताईंना आम्ही हात जोडून विनंती करत आहोत की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
संबंधित महिलेच्या दाव्यानुसार, सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून २०१८ मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. पुढे चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटही झाली होती. यानंतर सिद्धांतकडून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला जात होता. परंतु, महिला आधीच विवाहित होती. सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेऊन लग्न केले, असा दावा महिलेने केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत १४ जानेवारी २०२२ रोजी विवाह केल्याचा दावाही या महिलेने केला आहे. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यांनी मला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितले. छत्रपती संभाजीनगरला येण्यास नकार दिला होता. तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपू्र्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकीही दिली जात होती, असा आरोप या महिलेने केला आहे.