मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी ‘एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्यादृष्टीने संपलेली आहे, त्यामुळे नवा ‘उदय’ होईल’, असे विधान केले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यानंतर आता ठाकरे आणि वडेट्टीवार यांच्या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा दावा केला आहे. सामंत हे दावोस दौऱ्यावर असून त्याठिकाणाहून त्यांनी मोठे विधान केले आहे.
यावेळी बोलतांना सामंत म्हणाले की, “शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) ४ आमदार आणि ३ व काँग्रेसचे ५ आमदारांनी मागील १५ दिवसांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. लवकरच हे सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक जिल्हाप्रमुख देखील संपर्कात असून येत्या तीन महिन्यात हे सगळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे, ही खऱ्या अर्थाने आजची ब्रेकिंग आहे, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हणून ही मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील महिन्याभरात भेटलेली आहे, यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा, परंतु ठामपणाने सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये (Congress) थांबणार नाहीत, त्यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल”, असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.