संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पूल बांधून दाखविले आहेत. तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अपर तहसील कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी आहे. तुमच्या यशोधनातून जनतेला मुक्तता हवी होती. विधानसभेला तालुक्यातील जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेला मिळालेले स्वातंत्र्य आता तुम्ही हिरावून घेवू नका, असा खरमरीत टोला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री थोरातांचे नाव न घेता लगावला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच थोरातांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासाठी निमित्त होते अपर तहसील कार्यालयाचे. हे कार्यालय आश्वी आणि पंचक्रोशीतील गावे तसेच अन्य शेजारील गावे यांच्या सुविधेसाठी तयार होणार होते, परंतू काहींना पोटशूळ उठला, त्यांनी लगेच तालुका तोडण्याची भाषा सुरु केली, त्यांना स्वातंत्र्याची लढाई आठवली.
आश्वीच्या लोकांना अपर तहसील कार्यालय हवे आहे, या भागातील त्यांच्या समर्थकांनाही विचारा तुम्हाला कार्यालय हवे आहे की नको. यापूर्वी सुध्दा पोलीस ठाण्यामध्ये समाविष्ट असलेली गावे त्यांनी जाणीवपूर्वक काढून घेतली होती. उच्च न्यायालयात लढाई करुन ही गावे पुन्हा आश्वीमध्ये समाविष्ट केली याकडे लक्ष वेधून ना. विखे पाटील म्हणाले, अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्यानंतर कार्यालयाची निर्मिती होईल. ज्या गावांना समाविष्ट व्हायचे नसेल त्यांना उगळून हे कार्यालय होणारच असे ठामपणे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडवले आहे.
तुमच्या यशोधनमधूनच तालुक्यातील जनतेला मुक्तता हवी होती. जनतेने केलेल्या परिवर्तनातूनच अमोल खताळांसारखा एक सामान्य तरुण लोकांनी आमदार म्हणून निवडून दिला. आम्ही जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नाही. अपर तहसील कार्यालयाची चर्चा सुरु झाली तर यांना स्वातंत्र्याची लढाई आठवली. आता जरा शांत बसा, जनतेने तुमच्या बाबतीत निर्णय केला आहे. त्यांना त्यांचे काम करु द्या. तुमच्या कारकीर्दीत वाळू आणि क्रशरमाफियांना वैभव प्राप्त झाले. महायुतीचे पाठबळ हे जनतेच्या पाठिशी कायम असल्याचा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.