नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला. मात्र, यानंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने (India) तसेच पाकिस्ताने एकमेकांच्या विरोधात घेतलेले निर्णय कायम आहेत. यावर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबाबतच्या (Pakistan) धोरणावर अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. तसेच सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे (Ministry of External Affairs) प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की,” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापाराबाबात झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर सहमती झाली असे म्हटले होते. मात्र, दोन्ही देशांमधील शस्त्रविरामाचा निर्णय हा सैन्याच्या कारवाईनंतर घेण्यात आला. असे त्यांनी सांगितले. तसेच जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवावा”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झाल्यापासून १० मे गोळीबार (Firing) आणि सैन्य कारवाई बंद करण्याबाबत सहमती होण्यापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्या नेत्यांमध्ये लष्करी कारवाई बद्दल चर्चा झाली. या कोणत्याही चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. तसेच पाकिस्तान जोपर्यंत त्यांच्या देशात पोसला जाणारा दहशतवाद संपवणार नाही, तोपर्यंत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती कायम राहील”, असेही रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने पीओके खाली करावे
भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरशी संबंधित कोणत्याही मुद्द्याला भारत आणि पाकिस्तानला द्विपक्षीय पद्धतीने चर्चा करुन सोडवायचा आहे. या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तु्म्हाला माहिती आहे की, हा मुद्दा पाकिस्तानकडून भारताच्या भूभागांवर अवैधपणे कब्जा केल्याचा आहे. पाकिस्तानने भारताची कब्जा केलेली जागा खाली करावी. पाकिस्तानने पीओके खाली करावे. आम्हाला या मुद्द्यांवर कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही, असेही रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. त्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्ववस्त केले. पाकिस्तान आधीपासूनच दहशतवाद्यांना खतपाणी घालत आलेला आहे. भारतात २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने ६ मे ला दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना उद्ध्वस्त केले. आता पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा गोळीबार किंवा हल्ला केला तर भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी म्हटले.