अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
शहरातून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना दररोजच घडत आहेत. दोन दिवसांत पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर मंगळवारीही दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या घटना तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. वडगाव परिसरात राहणार्या 39 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय 17) मंगळवारी सकाळी अहिल्यानगर शहरातील एका कॉलेजमध्ये सीएटी कोचिंग क्लासचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. फिर्यादीने तिला फोन केले असता तिने फोन उचलले नाही. नंतर तिचा फोन बंद झाला. ती घरी परत न आल्याने फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून मुलीचा शोध सुरू केला आहे.
काटवन खंडोबा परिसरात राहणार्या एका 22 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या अल्पवयीन बहिणीला (वय 16) अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी 9 वाजता फिर्यादीची आई कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. घरात फिर्यादी आणि तिच्या तीन बहिणी होत्या. पाय दुखत असल्याने अल्पवयीन बहिणीने शेजारी राहणार्या महिलेच्या घरी पाय चोळून घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती बराच वेळ झाला तरी घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी सुरूवातीला शेजारी, नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली, पण तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.