श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
करोना एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीच्या साप्ताहिक बैठका नियमित होत नसल्याच्या तक्रारींची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच सदस्य उत्कर्षा रूपवते व दीपिका चव्हाण यांनी मंगळवारी गंभीर दखल घेतली.
महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत त्यांनी मंगळवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेतली. त्यानंतर त्यांची शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक अशोक कुटे (अहमदनगर), मिलिंदकुमार साळवे (श्रीरामपूर), कारभारी गरड, मनीषा काळे, वंदना ढोकणे (नेवासा), संगीता मालकर (कोपरगाव), प्रथमेश सोनवणे, वसंत साबळे, सुनील खंडागळे (शेवगाव) यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली.
काही तालुक्यांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये तालुका मिशन वात्सल्य समितीच्या बैठका नियमित होत नाहीत. ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय समितीचे कामकाज होत नाही. त्यामुळे दोन वर्षांनंतरही कोरोना एकल महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. मयत पतींच्या मालमत्तांना वारस म्हणून एकल महिलांच्या नावांची नोंद झालेली नाही.
त्यामुळे मिशन वात्सल्य समितीच्या बैठका नियमित घेऊन समितीच्या कामकाजास गती द्यावी, अशी तक्रार मिलिंदकुमार साळवे, अशोक कुटे, संगीता मालकर, कारभारी गरड यांनी आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, सदस्या उत्कर्षा रूपवते, दीपिका चव्हाण यांच्याकडे केली. त्यावर याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना याबाबत निर्देश देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.