Saturday, July 27, 2024
Homeनगरसरकारकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही - आ. थोरात

सरकारकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी सुविधा देणारी बाजार समिती ही मध्यवर्ती सुविधा आहे. देशातील व राज्यातील सरकार हे भांडवलदारांसाठी विविध धोरणे राबवत आहे. मात्र शेतकर्‍यांना कोणतीही मदत करत नाही, अशी टीका माजी कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर होते. तर व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लहानुभाऊ गुंजाळ, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, उपसभापती गिताराम गायकवाड, संचालक कैलासराव पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, विजय सातपुते, सुधाकर ताजणे, अनिल घुगे, सौ. दिपाली वर्पे, सौ. रुक्मिणी साकुरे, अरुण वाघ, सखाराम शरमाळे, संजय खरात, निलेश कडलग, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन कर्पे, सचिव सतीश गुंजाळ, विष्णुपंत रहाटळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या मदतीकरता बाजार समितीची स्थापना केली. हाच पॅटर्न आज देशांमध्ये राबवला जात आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात बाजार समितीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांविरोधी केलेले तीन काळे कायदे पंजाब, हरियाणा, राजस्थान या शेतकर्‍यांनी उधळून लावले. सुमारे वर्षभर चाललेल्या या आंदोलनात 750 शेतकर्‍यांचा बळी गेला. सरकारने ग्राहक व नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये आवश्यक गोष्टी द्याव्यात. मात्र यासाठी शेतकर्‍यांचे नुकसान करू नये. सरकार फक्त घोषणाबाजी करते आहे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणतीही मदत करत नाही.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल ही कौतुकास्पद असून वडगावपान येथे 16 एकरच्या प्रशस्त जागेत नवीन बाजार समिती टोमॅटो, कांदा, डाळिंब, हे मार्केट सुरू करता येईल. संगमनेरचे राजकारण समाजकारण विकासाचे, प्रेमाचे, आणि बंधू भावाचे आहे. येथे सर्वांना मानसन्मान मिळतो आहे. सर्व संस्था चांगले काम करत असल्याने संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. मागील आर्थिक वर्षात बाजार समितीने 400 कोटींचा व्यवहार केला असून निळवंडे चे पाणी या परिसरात फिरल्यानंतर 1000 कोटींच्या वर उलाढाल होईल, असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध आधुनिक प्रणाली राबवून संगमनेर बाजार समितीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चांगल्या कामावर विश्वास टाकताना तालुक्यातील जनतेने एकत्र येऊन बाजार समितीत अत्यंत मोठा विजय मिळवला असल्याचेही ते म्हणाले.

शंकरराव खेमनर म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना कांद्यासाठी 350 रु. अनुदान मिळाले आहे. सरकारकडून मोठ्या घोषणा करून शेतकर्‍यांची फसवणूक सुरू असल्याची टीका ही त्यांनी केली. बैठकीचे नोटीस वाचन समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी केले. प्रास्ताविक शंकरराव खेमनर यांनी केले तर सुरेश कान्होरे यांनी आभार मानले.

वेबसाईट व पेट्रोल पंपचा शुभारंभ

महाराष्ट्रात प्रथमच संगमनेर बाजार समितीने शेतमाल वजनाचे अचूकतेसाठी सॉफ्टवेअर बनवले असून या डिजिटल प्रणालीमुळे अचूकता, पारदर्शकता व गुणवत्ता यांसह सर्व शेतकर्‍यांना व नागरिकांना या तात्काळ शेतमालाच्या वजनाची अचूक माहिती मिळणार आहे. या सॉफ्टवेअरचा शुभारंभ व बाजार समितीच्या नव्याने झालेल्या पेट्रोल पंप चा शुभारंभही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या