Saturday, July 27, 2024
Homeनगरपालकमंत्रीच रहा, मालक बनू नका

पालकमंत्रीच रहा, मालक बनू नका

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून रहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना दिला.

- Advertisement -

पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने त्यांचा राग मी समजू शकतो. धाक दपटशा आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे. दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला, लम्पी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढायला ते संगमनेरमध्ये येतात. मात्र येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर जनता सहन करणार नाही.

निळवंडे धरणातून जेव्हा चाचणी केली गेली त्याकाळात अजून महिनाभर पाणी सुरू ठेवले असते तर काही बिघडले नसते. आज जाणवणारी दुष्काळाची दाहकता कमी झाली असती. मात्र त्यामुळे संगमनेर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या जीवनात आनंद निर्माण झाला असता तोच न बघवल्याने तातडीने पाणी बंद करण्यात आले. गेली महिनाभरापासून आम्ही सातत्याने मागणी करतोय, आंदोलने करतोय की निळवंडे धरणातून कालव्यामध्ये पाणी सोडा. बरं ही मागणी फक्त संगमनेर तालुक्यातील जनतेची आहे असे नाही, राहाता तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याच्या आग्रही मागणीसाठी संगमनेरमध्ये आली होती. आपल्याकडे मात्र त्यांचा टाहो ऐकायला वेळ नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही निळवंडे धरणातून तातडीने पाणी सोडा आणि जनतेला धीर द्या आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी सोडून झाल्यावर लगेच निघून जाऊ नका ते पाणी शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचते की नाही यावरही लक्ष ठेवा. टँकरच्या संख्येवरून दुष्काळाचे मोजमाप करणार्‍या पालकमंत्र्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. दुष्काळाच्या दाहकतेने होरपळणार्‍या जनतेच्या वेदनांवर हे फुंकर घालायला आले होते की त्यांच्या वेदनेशी खेळायला? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. दुष्काळ ही राजकारण करण्याची जागा नाही. मात्र दुर्दैवाने पालकमंत्री अशाप्रकारे वागताना दिसत असल्याची टीकाही ज्येष्ठ नेते आ.थोरात यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या