Thursday, September 19, 2024
Homeनगरमहाराष्ट्रातील यश आमच्या जीवावर मिळाले याचे काँग्रेस नेत्यांनी भान ठेवावे

महाराष्ट्रातील यश आमच्या जीवावर मिळाले याचे काँग्रेस नेत्यांनी भान ठेवावे

आमदार भास्करराव जाधव यांचा काँग्रेसला घरचा आहेर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्या मतदारसंघात दावा करत असेल तर त्यांनी 2019 च्या निवडणुकीचा इतिहास तपासावा. कारण त्यावेळी त्यांची स्थिती ही केंद्रात चौथ्या स्थानी होती तर महायुतीत ते तिसर्‍या स्थानी होते. त्यामुळे आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात त्यांना यश मिळून ते पहिल्या क्रमांकावर आले असले तरी हे यश आमच्या जीवावर मिळाले याचे काँग्रेस नेत्यांनी भान ठेवावे या शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे आ. भास्करराव जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.

आ. जाधव यांनी साईदरबारी हजेरी लावली. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांबरोबरच सहयोगी पक्षाचाही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्युद्धावर बोलताना जाधव म्हणाले, या सर्व प्रकाराला फडणवीस जबाबदार असून त्यांचा राजकीय अंत जवळ आल्याने ते असे बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा देशाने विचार करावा, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाला जबाबदार कसे? असा सवाल सत्ताधार्‍यांना केला. आगामी विधानसभेत आपला विजय निश्चित असून दीड फूट चंगू मंगुंना आपण किंमत देत नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता राणे यांना लगावला. नुकत्याच एका कार्यक्रमात देशाच्या गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर असल्याचे वक्तव्य केले होते.

या वक्तव्याचा समाचार घेताना जाधव म्हणाले, स्वत: हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या तसेच मुस्लिमांचा द्वेष करणार्‍या भाजपाला महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम, अबू आझमीची मते कशी चालतात? राज्यात सध्या कायदा सुव्यवस्था बिघडण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंना संपवण्याची भाषा करताना लोकच तुम्हाला संपवून टाकणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.जाधव यांच्या साई दर्शनानंतर राष्ट्रवादीचे अजीत पवार गटाचे रमेश गोंदकर, विजय जगताप, भाजपचे शिवाजी गोंदकर, सुजीत गोंदकर, शिवसेनेचे संजय शिंदे, सचिन कोते, पुंडलिक बावके आदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जोपासतो यामुळेच हे घडत असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या