नागपूर | Nagpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ (Oath) घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “मनोज जरांगेंना (Manoj Jarange) अंगावर घेण्याचे बक्षीस मला मिळाले आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातं असून मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाही. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं. तसेच अजित पवारांशी मी चर्चा केली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही”, असे म्हणत छगन भुजबळांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.
दरम्यान, २०१४ ते २०१९ हा काळ सोडता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देखील काम केले आहे. परंतु आता त्यांना संधी दिली गेली नाही. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ७ अमदारांपैकी नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळाले आहे. राष्ट्रवादीत आणि जिल्ह्यात छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्याने ते मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाल्याची चर्चा सुरु असतांना त्यांनी यावर भाष्य केले आहे.