अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे, ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देत असते. पवार कुटुंब हे एकच आहे. मात्र, काहीसे मतभेद असतील मात्र एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्यासह शरद पवार यांनी एकत्रितपणे घेतला पाहिजे. तसेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रियाताई या मध्यस्थी करू शकतात, असे सूचक विधान कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी केले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आ. पवार हे गुरूवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. यावेळी जिल्हाधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतर आ.पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मतभेद होऊन दुरावलेले ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा राजकारणात रंगत आहे. याचप्रमाणे पवार कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. यावर प्रतिक्रया देत आ. पवार यांनी एक सूचक विधान केले.
यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले की, राजकीय दृष्टिकोनातून मी काही बोलणार नाही. मात्र, परिवाराच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता आपली भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र राहण्याचे शिकवते. भारतीय संस्कृती असो किंवा पवार कुटुंबाविषयी बोलायचे झाले, तर पवार कुटुंब एकच आहे. मात्र जो, काही थोडेफार मतभेद असतील तर मिटावे, अशी इच्छा आ. पवार पवार यांनी व्यक्त केली. तसेच पुढे ते म्हणाले, पवार कुटुंबांनी अधिक ताकदीने एकत्र आले पाहिजे, अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार आणि आज दुसर्या पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी एकत्र येत निर्णय घेण्याची गरज आहे.
जर या गोष्टी कोणी मध्यस्थी करू शकत असेल, तर ते म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे या आहेत. म्हणूनच या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल, यावर आज तर भाष्य करता येणार नाही. मात्र येणार्या काळात ते तिघेच एकत्र येणाबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात, असे यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले. आ. पवार यांच्या सुचक वक्तव्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.