मुंबई | Mumbai
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील मतदारांना आकर्शित करण्यासाठी नेते मंडळी प्रक्षोभक वक्तव्य करत असतात. असेच वक्तव्य सोमवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्यांच्यावर चहुबाजून टीका होत आहे. सुर्वे यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई आहे. तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे. एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असे वक्तव्य करून वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार सुर्वेंवर चहुबांजूंनी टीका सुरु झाली आहे. शिवेसना आणि मनसेकडून त्यांच्यावर टीकास्त्र सुरु झाले.
शिवसेनेकडून सडकून टीका
मतांच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला. उद्धव सेनेच्या किशोरी पेडणेकरांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2022 रोजी आईलाच नमस्कार करुन ते बाहेर पडले. त्यांना आई आणि माता याच्यातील फरक तरी कळतो का? असा सवाल त्यांनी केला. मतांच्या लाचारासाठी त्यांनी असे विधान केल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
माय मरो मावशी जगो ही म्हण- मनसे
“माय मरो मावशी जगो ही म्हण, जेव्हा बाळ लहान असताना गेली तर मावशी आहे असा त्याचा अर्थ आहे. पण यांनी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ती मतं मिळवण्यासाठी लाचारी असून, स्वत:च्या आईलाही मारायला निघाले आहेत अशी प्रवृत्ती आहे. मतांसाठी हे सर्व केले जात आहे,” असा संताप मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, “तेजस्वी यादव सांगतात आम्ही मुंबईत उत्तर भारतीय भवन बांधू. सगळ्यांना उत्तर प्रदेश आणि काहींना मुस्लिमांबाबत अचानक प्रेम आले आहे. निवडणूक आली की हे प्रेम येतं. कारण त्यांना ही मतं हवी असतात आणि हे मिळणार हे माहिती असतं. मराठी मतदार सर्वांमध्ये विभागलेला असतो. पण हे उत्तर भारतीय मतदार एकगठ्ठ मिळणार हे माहिती असताना त्यांचे लाड पुरवण्यासाठी ही विधानं केली जातात”.
प्रकाश सुर्वेंची हात जोडून माफी
आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे. मराठी माझी माय माऊली आहे.अनावधनाने माझ्याकडून हा शब्द गेला असेल. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. माझ्याकडून चुकून शब्द निघाला आल्यामुळे मी मराठी माणसाची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करत आहे, असे म्हणत आमदार प्रकाश सुर्वे यांनी हात जोडून माफी मागितली.
मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
तर मंत्री उदय सामंत यांनी आमदार सुर्वे यांच्याकडून चुकून हा शब्द बाहेर पडला. त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पण काही जण त्यांच्या वक्तव्याचा आधार घेत राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठी भाषेसाठी आम्ही काम करत असल्याचे सामंत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





