Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगमातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

कोणाच्या कसल्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही चळवळीशिवाय, कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीशिवाय किंवा कसल्या अनुदानाशिवाय मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या जगभर आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी, भारताच्या अन्य प्रांतातील चार कोटी आणि जगभरातील विखुरलेली मराठी माणसे त्यांचे मराठीपण टिकवून आहेत.

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असे म्हणणारे आणि मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहोचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणार्‍या सगळ्या तथाकथित मराठी भाषा प्रेमींना आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा अधिक समृद्ध आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह’, म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी ईश्वरावर प्रीत जडली’. आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत पडतं!’ इंग्रजीत मराठीच्या तुलनेत शब्दसंग्रह कमी आहे. काका-काकी हे शब्द आपण चुलता-चुलतीसाठी वापरतो. मामा-मामी हे शब्द आईच्या भावासाठी आणि त्याच्या बायकोसाठी वापरतो. इंग्रजीत अशा नातेसंबंधांना एकच शब्द वापरतात.

मराठीचा भाषिक इतिहास खूप जुना आहे. मराठी ही शूर आणि पराक्रमी लोकांची भाषा आहे. कोणत्याही भाषेत किती कर्तबगार माणसे झाली यावरून त्या भाषेचे महत्त्व ठरते. मराठी भाषेने जगाला सर्व क्षेत्रातील दिग्गज दिलेत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकाचा जरी त्यासाठी विचार केला तरी क्रिकेटचे महानायक मराठी आहेत, गायनातील सम्राज्ञी मराठीतील आहेत, चित्रपटसृष्टीचे जनक आणि महानायक मराठीतील आहेत. मग प्रश्न पडतो की, ज्या भाषेतील सुपुत्र जगभर लौकिक प्राप्त करत आहेत ती भाषा मोठी का होत नाही? आपल्या भाषेचे सामर्थ्य का वाढत नाही? ती उपेक्षित का राहते?

- Advertisement -

दोन मराठी माणसे बाहेर कुठेही भेटली की हिंदी किंवा इंग्रजीत संभाषण सुरू करतात. हा न्यूनगंड विसाव्या आणि एकविसाव्या शतकात निर्माण झालाय. सोळाव्या किंवा सतराव्या शतकात मराठी माणसात असा न्यूनगंड नव्हता. तसे नसते तर ज्या ज्या अमराठी भागात आपली मराठी माणसे आहेत ते तिथे तिथे आपापल्या घरी मराठीत बोलत राहिले नसते. तिथे मराठी शब्दांची पखरण झाल्याचे आपल्याला दिसले नसते. त्यामुळे मराठी माणसाने भाषेविषयीचा आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकणे ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे.

कोणाच्या कसल्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही चळवळीशिवाय, कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीशिवाय किंवा कसल्या अनुदानाशिवाय मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या जगभर आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी, भारताच्या अन्य प्रांतातील चार कोटी आणि जगभरातील विखुरलेली मराठी माणसे त्यांचे मराठीपण टिकवून आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेत मराठी दहाव्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ ही सामर्थ्यशाली भाषा आहे. ही भाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाषणासाठी वापरली, या भाषेतून छत्रपती संभाजीराजे व्यक्त झाले, ही भाषा अभिव्यक्त करणारी मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यामुळे ही भाषा सामर्थ्यशाली आहे, हे सांगण्यासाठी कुणाचे प्रमाणपत्र कशाला हवे?

आपली भाषा इतकी सामर्थ्यशाली असताना या भाषेतून सर्व शाखांचे शिक्षण का दिले जाऊ नये? आता आता अभियांत्रिकीपासून ते विधीशाखेपर्यंतचे शिक्षण मराठीत उपलब्ध झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. हे असे नेमके का होते?

आपण इंग्रजीतून मराठी करताना किंवा मराठीचे इंग्रजीकरण करताना कोणते शब्द वापरतो ते महत्त्वाचे आहे. म्हणजे ‘अकॉर्डिंग टू सेक्शन थ्री हंड्रेड अ‍ॅण्ड टू मर्डर इज क्राईम’ हे अनेकांना समजते. ‘भारतीय दंडसंहितेच्या धारा 302 अन्वये मृत्युदंड हा दखलपात्र गुन्हा आहे’ हे समजायला अवघड जाते. त्यामुळे ‘भाषेतली क्लिष्टता काढून टाका’, असे आचार्य अत्रे सांगायचे. ऑक्सफर्ड स्वतःचा शब्दकोश काढते. त्यात इतर भाषेतील दीडशे ते दोनशे शब्द दरवर्षी इंग्रजीत वाढतात. आपणही इतर भाषेतले आपल्याकडे रुजलेले शब्द आपल्यात समाविष्ट करून घेण्याऐवजी ते काढून टाका म्हणून का ओरड करतो? असे शब्द काढून टाकणे हा भाषा समर्थ, सामर्थ्यशील करण्याचा उपाय नाही. मराठीत आलेले व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, इमेल, जीमेल, असे तंत्रज्ञानाविषयीचे किंवा अन्य रुजलेले, रुळलेले शब्द आपण स्वीकारायला हवेत.

आचार्य विनोबा भावे मराठीसह अनेक भाषा बोलायचे. पी. व्ही. नरसिंहरावांना अनेक भाषा ज्ञात होत्या. ही मंडळी बहुभाषिक होती. त्यामुळे मराठी भाषेचे सामर्थ्य वाढवायचे असेल तर शिक्षणाची ज्ञानभाषा ही मातृभाषा असायला हवी, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे.

भाषेबाबत मानसिकता बदलणे आणि भाषेवर प्रेम करणे आत्यंतिक गरजेचे आहे. कोणत्याही भाषा आपल्याला भुरळ घालत असल्या तरी ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने त्या आत्मसात कराव्यात पण आपली आई मराठी आहे, याचे भान कायम ठेवावे. हे भान ठेवले की मातृभाषेचा ज्ञानभाषेकडील प्रवास खर्‍या अर्थाने सुरू होईल.

(लेखक ‘चपराक प्रकाशन’चे संचालक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या