नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce) व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या(Union Ministry of Micro, Small and Medium Enterprises) संयुक्त विद्यमाने राज्यातील युवक व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने बुधवार दि.23 नोव्हेंबर ते दि.15 मार्चदरम्यान राज्यातील 36 जिल्ह्यांत 75 ठिकाणी प्रोत्साहन अभियान राबवले जाणार आहे. त्याद्वारे 50 हजार लोकांपर्यंत पोहोचून त्यांपैकी किमान पाच हजार युवक व 5 हजार महिला उद्योग सुरू करतील, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
गांधी यांनी शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. राणे यांनी या अभियानाला मान्यता दिली असून, हे अभियान राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने राबवले जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून व्यापार-उद्योगातील नवीन संधी, सरकारच्या अर्थ पुरवठा, अनुदानासाठीच्या योजना, प्रशिक्षण यासंबंधीची माहिती या अभियानातून दिली जाणार आहे. या अभियानांतर्गत उद्योग आधार योजनेखाली व्यापार, उद्योगांच्या नोंदणीची मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.‘महाराष्ट्र चेंबर’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या जयंतीपासून (दि. 23) अभियानास सुरुवात होईल.
या मोहिमेतून राज्यातील 50 हजार जणांपर्यंत पोहोचून किमान पाच हजार युवक व पाच हजार महिला नवीन उद्योग सुरू करतील,अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानासाठी चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, युवा शाखेचे अध्यक्ष संदीप भंडारी, आशिष नहार आदी कार्यरत आहेत. राणे यांच्या भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात संदीप भंडारी, चेंबरचे दिल्ली प्रतिनिधी जे. के. जैन आदी उपस्थित होते.