पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
लोकसभा निवडणुकीत पराभव केला म्हणून माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून माझ्या विरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला. विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. लंके समर्थकांचा सुपा येथे मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
खा. लंके म्हणाले, या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता, एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा, असा सल्लाही खा. लंके यांनी दिला.
यावेळी माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दीपक लंके, योगिराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारूती रेपाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, अॅड. राहूल झावरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, गंगाराम बेलकर, दादा शिंदे, भागुजी झावरे, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, उत्तम साळुंके, सुवर्णा धाडगे, वसंत ठोकळ, सतीश पालवे, किसन सुपेकर, शकुंतला लंके, ऐश्वर्या ढोरजकर, वंदना गंधाक्ते, डॉ.विद्या कावरे, राजेश्वरी कोठावळे, वंदना ठुबे, सायली चेडे, अशोक घुले, ठकराम लंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत काठावर पराभव झाला हा निश्चितच चिंतनाचा भाग आहे. तुम्ही आत्मचिंतन करा. आजचा व येणारा काळही आपलाच आहे. नीलेश लंके हा उगवता सूर्य आहे, तो खचत नाही. चूक झाली ती झाली आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करूया. आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुका दुरूस्त करा. समाजाला दोष देऊ नका असेही खा.लंके म्हणाले.
जाती पातीचे राजकारण
निवडणूक ही बंदुकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नसल्याचेही खा. लंके म्हणाले.