नाशिक | Nashik
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and Shivsena) या पक्षांची युती तुटली आणि नवी समीकरणे राज्याच्या राजकारणात उदयास आली. युती कशामुळे तुटली याबाबत दोन्ही बाजूचे नेते अनेकदा दावे-प्रतिदावे करत असतात. अशातच भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल एका कार्यक्रमात बोलतांना केवळ चार जागांच्या वादामुळे युती तुटल्याचा दावा केला होता. त्या दाव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलतांना फडणवीसांची बाजू घेत भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “आता २०२५ सुरू असून २०१४ आणि २०२५ मध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी इच्छा देवेंद्र फडणवीसांची होती. मात्र, २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून (Delhi) त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते, युती तोडायची असं दिल्लीतून ठरले होते. जागा वाटपात चर्चेचे फक्त गुऱ्हाळ सुरू होते. बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते याचा फायदा घ्यावा आणि शिवसेनेला (Shivsena) आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हते, तेव्हा गावागावात या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवले आहे. शिवसेनेच्या पोटनिवडणुकीच्या (By-Election) विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आपल्यासोबत असेल तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो, असे भाजपाला त्यावेळी वाटले होते”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच “राज्य सरकार देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत आहे, बुलडोझर फिरवून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई (Action) केली जात आहे. पण नागपूर दंगलीची ठिणगी टाकणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगत असाल तर शिवाजी महाराजांनी प्रजेला त्रास देणाऱ्या आपले सहकारी आणि नातेवाईकांनाही सोडले नव्हते, ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावी. तुमच्या मंत्रिमंडळातील लोक कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे एकप्रकारे गृहमंत्र्यांना आव्हान आहे, हे देवेंद्र फडणवीसंनी समजून घ्यावे. विरोधकांवर नुसता चिखलं उडवणं याला राज्य करणं म्हणत नाही”, असे संजय राऊत यांनी सांगितले.