मुंबई | Mumbai
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून घमासान सुरू असून यावरून नागपुरात (Nagpur) दंगल उसळली होती. या दंगलीत पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, नागपूरकरांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रात संशोधनाचा विषय आहे. होळीलाही (Holi) वातावरण खराब केलं. राजापुरात काय केलं? होळीसारख्या सणाला महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील. औंरगजेबाची ढाल करून काही लोक दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबरीचं उदाहरण देत आहेत, बाबरीप्रमाणे आम्ही औरंगजेबाची (Aurangzeb’s) कबर उद्ध्वस्त करत आहोत. सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत. आमचं असं म्हणणं आहे की सरकार तुमचं आहे ना मग दंगली का करताय? सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करावी”, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. आम्ही वारंवार सांगत आहोत आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे ते प्रतिक आहे. औरंगजेब आला, अफझलखान, शाहिस्तेखान आला आणि परत गेला नाही. मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी त्यांची कबर येथेच खणली, हे शौर्याचे प्रतिक आहे. पण RSS संघाची विचारधारा अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करायचे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
तसेच “१९९२ सालचा बाबरी मस्जिदचा लढा वेगळा होता. या लढ्याबाबत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) काय म्हणाले होते, हे त्यांनी समजून घ्यावं. बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं की आम्हाला फक्त बाबरीमध्ये रस आहे. आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सर्व कबरी आणि मस्जिदी तुमच्या आहेत. आम्ही तिथे ढुंकूनही पाहणार नाही. फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू. जिथं अतिक्रमण झालं, त्याच जागेवर. या देशामध्ये हिंदू मुस्लिम यांनी सामंजस्याने राहिलं पाहिजे, तरच देश टीकेल ही बाळासाहेबांची भूमिका होती. रोज उठून एक मस्जिद आणि कबर तोडायची हे हिंदुत्त्व बाळासाहेबांनी कधी रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.