नाशिक | Nashik
एक महिन्यात शेतकऱ्यांना (Farmer) सरसकट कर्जमाफी न केल्यास सरकारला रस्त्यावर (Road) फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढला. त्यावेळी सुळे बोलत होत्या.
यावेळी पुढे त्या म्हणाल्या की, “आपआपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना कार्यकर्त्यांनी सरसकट कर्जमाफीचे निवेदन द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शिवाय २५ लाख बहिणीची नावे कमी केली. त्या भगिनींची भेट घेऊन रोहिणी खडसे व खा.फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशाराही सुळे यांनी दिला.
तसेच “नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) ६५ हजार शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार कृषिमंत्री व पंतप्रधानांची भेट घेणार असून, आजचा आक्रोश मोर्चा ही सुरवात आहे. न्याय देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असून सर्वांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे”, असेही सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
शेतकऱ्यांना पवारांकडून अपेक्षा – जयंत पाटील
राज्याबरोबरच देशातील शेतकऱ्यांना शरद पवार यांच्याकडूनच अपेक्षा उरल्या आहेत असा दावा करत माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, कांदा,सोयाबीन,कापूस असा सर्वच शेतमाल उत्पादक शेतकरी संकटात आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आदिवासींवरही अन्याय सुरु आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे सरकार असून ७/१२ कोरा करणार असे म्हणणाऱ्या या सरकारला लक्ष द्यायलाही वेळ नाही. आपल्याला ७/१२ कोरा करून घ्यायचा आहे असे आवाहन जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.




