अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. अभय योजना 2024 नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी व्याज आणि विलंब आकारात सूट मिळणार आहे. अहिल्यानगर मंडळातील 1 हजार 917 लघुदाब ग्राहकांनी 1 कोटी 68 लाख रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली आहे. यामुळे नवीन ग्राहक वीज जोडणी मिळण्यासाठी पात्र झाले असून उर्वरित वीज ग्राहकांचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेचा लाभ 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत थकबाकी भरून घेता येणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
31 मार्चपर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे. वीज बिलाचा वाद न्याय प्रवीष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी अभय योजना आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
योजनेचा लाभ घेतलेले
अहिल्यानगर शहर विभाग 473 ग्राहक आणि घेतलेला लाभ 26 लाख 8 हजार. अहिल्यानगर ग्रामीण 329 ग्राहक आणि 39 लाख 19 हजार. कर्जत विभाग 378 ग्राहक आणि 30 लाख 91 हजार. संगमनेर विभाग 321 ग्राहक आणि 45 लाख 98 हजार. श्रीरामपूर विभागात 416 ग्राहक आणि 26 लाख 65 हजार.