अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरांमध्ये वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ विद्युत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातील वीजपुरवठा बंद करून मेणबत्ती पेटवून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. पुढील आठ दिवसांमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, संजय सपकाळ, दीपक खेडकर, सारंग पंधाडे, जॉय लोखंडे, रंजना उकिरडे, साधना बोरूडे, आरती उफाडे, स्वप्नील ढवन, महेश गलांडे आदी उपस्थित होते. शहरामध्ये ग्राहकांकडून दंडलशाही पध्दतीने वीज बिलाची वसुली केली जाते. मात्र त्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. मुळा धरण येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधिकारी वर्ग एसी लावून थंड वातावरणात बसतात मात्र नागरिक अक्षरश: गर्मीमध्ये आपली रात्र काढत असतात.
नागरिकांनी फोन लावल्यानंतर विद्युत विभागाच्यावतीने कधीही फोन उचलला जात नाही. नागरिकांना मुजोर पध्दतीने उत्तरे दिली जातात. पावसाळ्यापूर्वीच दुरूस्तीचे व झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेणे गरजेचे होते, मात्र कुठल्याही उपयोजना न केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा भावना बारस्कर यांनी व्यक्त केल्या. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक यांचे अतोनात हाल होत आहे. पावसाचे थेंब सुरू होण्यापूर्वीच वीज गुल होत असते, आठ दिवसांमध्ये वीजपुरवठा नियमित पणे सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा बनसोडे यांनी दिला.
येत्या 8 दिवसांमध्ये सर्व वीज वाहिन्याचे देखभालीची कामे पूर्ण करण्यात येतील त्यानंतर वीजपुरवठा खंडित होणार नाही. रोहित्राचे डीपी बॉक्स व त्याचे दरवाजे गरजेच्या ठिकाणी त्वरीत बदली करण्यात येतील. रस्त्यामधील असलेले विद्युत पोल महानगरपालिकेच्या समन्वयाने शिफ्ट करण्यात येतील. महावितरण कर्मचार्यांनी तोडलेल्या झाडाच्या फांद्या त्वरीत उचलण्यात येतील, वाकलेले वीज पोल सरळ करण्यात येतील. अतिभारीत असलेले वीज रोहित्राचे ठिकाणी उच्च क्षमतेचे रोहित्र बदलण्यात येतील. तसेच महावितरणच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी स्विकारला नाही तर संबंधितांवर कंपनीच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळास दिले.