Saturday, July 27, 2024
Homeनगरमुळा, गंगापूरमधून आज पाणी...निळवंडे, दारणाचा विसर्ग वाढणार

मुळा, गंगापूरमधून आज पाणी…निळवंडे, दारणाचा विसर्ग वाढणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गात टप्प्याटप्याने वाढ करण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास 100 क्युसेक वेगाने निळवंडे धरणातून हे पाणी झेपावले. दरम्यान, प्रवरा काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश तलाठी, ग्रामपंचायत यांना दिले गेले आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातून जायडवाडीला पाणी सोडण्यास विरोध होता. यासाठी शेतकर्‍यांनी मोठा विरोधही केला. तर जायकवाडीला पाणी सोडावे यासाठी मराठवाडा विभागात आंदोलने झाली. भंडारदरा धरणातून रविवारी पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडीला नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडले गेले आहे.

पावसाळा संपवून हिवाळ्याची सुरवातच होत असून एवढ्या लवकर धरणसाठा रिक्त झाला तर काय, या प्रश्नामुळे अकोले तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.समन्यायी पाणीवाटपाबाबत पुर्नविचार व्हावा, यासाठी सातत्याने शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत. पाण्याचे नियोजन योग्य पध्दतीने न झाल्यास पुढील कालावधीत प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मुळावर निरीक्षण : फौजफाटा तैनात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील काही बंधार्‍यांच्या फळ्या काढण्याच्या राहिल्याने मुळा धरणातून जायकवाडीला नदीपात्राच्या सांडव्यातून आज उशिरा पाणी सोडण्याची शक्यता असून प्रशासनाने यासाठी पुर्वतयारी पुर्ण केली होती. मात्र, याबाबत पाटबंधारे विभागाकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा आदेश झाला आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणात सध्याचा पाणीसाठा 22 हजार 806 दलघफू असून त्यामध्ये मृतसाठा 4 हजार 500 दशलक्ष घनफूट आहे. मुळाधरातून जायकवाडीसाठी सुमारे 2.10 टीएमसी म्हणजेच 2 हजार 100 दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी मराठवाड्यातील जलसंपदा विभागातील अधिकारी वर्ग मुळाधरणावर स्थळ निरीक्षणासाठी हजर झाले असून प्रशासनाने यासाठी पुर्वतयारी सुरू केली आहे. मुळानदीवर राहुरी तालुक्यात डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजूळपोई हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. या बंधार्‍यांच्या फळ्या काढण्याचे काम पाटबंधारे विभागाचे काल उशिरा पर्यंत सुर होतेे.

मात्र, डिग्रस बंधार्‍याच्या काही फळ्या राहिल्याने आज पाणी सोडण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन मुळानदीवरील बंधार्‍यांवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करणार असल्याचे समजते. तसेच जायकवाडीला पाणी देण्यास जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विरोध असल्याने याबाबत माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

कडवा, मुकणेतून आज विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडी साठी दारणा धरणातून 192 क्युसेकने पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍याकडे सोडले जात आहे. दारणातील विसर्गात रविवारी 2000 क्युसेकपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. गंगापूर धरण समुहातूनही रविवारी 500 क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून प्रत्यक्षात गोदावरीत उद्या विसर्ग सुरु होईल. दरम्यान विसर्ग वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील मोटारी, साहित्य काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर गोदावरी मराठवाडा महामंडळाने पाणी सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार दारणातून रात्री 11 वाजता 192 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. तर रविवारी या विसर्गात वाढ होणार आहे. दारणातील विसर्ग 2000 क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दारणा समुहातुन 2.65 टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दारणाच्या वक्राकार गेट मधुन पाणी सोडणे सुरु आहे.

रविवारी गंगापूर, कडवा, मुकणे या धरणांतून जायकवाडीसाठी विसर्ग सुरु होणार आहे. आज सकाळी प्रथम 500 क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे. टप्प्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे दारणा समुह तसेच गंगापूर समुहातुन विसर्ग सुरु होणार आहे. दारणा धरणापासून जायकवाडी जलाशयाच्या बॅकवॉटर असलेल्या प्रवरासंगम हे 170 किमी अंतरावर आहे. तर गंगापूर धरणापासून जायकवाडी जलाशयाच्या बॅकवॉटर असलेले प्रवरासंगम हे 190 किलोमीटर अंतरावर आहे. गंगापूर धरण समुहातून अर्धा टिएमसी पाणी सोडले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या