Saturday, July 27, 2024
Homeनगरमुळा धरणातील खरीप पिकांच्या आवर्तनासाठी सूक्ष्म नियोजन करा

मुळा धरणातील खरीप पिकांच्या आवर्तनासाठी सूक्ष्म नियोजन करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुळा धरणाच्या खरीप हंगामातील आवर्तनाच्या संदर्भात पीक क्षेत्रनिहाय आढावा घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

मुळा धरणाच्या खरीप हंगामातील आवर्तनाच्या नियोजनासाठी ना. विखे यांनी मंगळवारी (दि. 15) विळद घाटात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, कार्यकारी अभियंता सायली पाटील तसेच जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते. मुळा धरण दरवर्षी 15 ऑगस्ट दरम्यान भरत असते.

परंतु यंदा पाऊसमान कमी असल्यामुळे धरणात 29425 दलघफू (78.55 टक्के) पाणीसाठा आहे. सध्या धरणात केवळ 1300 ते 1400 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. खरीप हंगामातील आवर्तनासाठी धरण परिचलन सूचीनुसार 25 टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. परंतु यंदा धरणात आवक वाढलेली नाही. याशिवाय पाणीवापर संस्थांनीही अद्याप मागण्या नोंदवलेल्या नाहीत.

असे असले तरी खडका, सलाबतपुर, दहिगाव, आव्हाने या शेवटच्या भागातून व मधल्या टप्प्यातील काही गावातून लोकप्रतिनिधींनी आवर्तनाची मागणी केलेली आहे. याबरोबरच यंदा मुळा धरणाच्या क्षेत्रात उसाची लागवड कमी आहे. लाभक्षेत्रात सोयाबीनची लागवडही कमी झालेली आहे. उजव्या कालव्याखाली 70689 हेक्टर क्षेत्र सिंचनाचे असले तरी खरीपामध्ये 22 हजारापर्यंत पेरणी झालेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कालव्यातून आवर्तनाचे खरीपातील पीकक्षेत्रांनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश मंत्री विखे यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या