मुबंई | Mumbai
येथील पवईत (Pavai) अभिनयाचे क्लास घेणाऱ्या स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांना डांबून ठेवले होते. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र, यावेळी पोलिसांकडून रोहित आर्यवर गोळीबार करण्यात आला होता. यात तो गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता उपचारादरम्यान रोहित आर्यचा (Rohit Arya) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओत एका वेब सिरिजसाठी ऑडिशन चालू होते. या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आले होते. सहा दिवसांपासून ऑडिशनची ही प्रक्रिया चालू होती. सकाळी दहा वाजता मुले ऑडिशनसाठी जात असतं त्यानंतर रात्री आठ वाजता मुले स्टुडिओच्या बाहेर येत होते. त्याआधी दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली जात होती. मात्र, आज मुले जेवणासाठी बाहेर आली नव्हती. यानंतर १७ मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन चालू केले होते. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका केली होती. यावेळी पोलिसांना रोहितकडे केमिकल,एअरगन सापडले होते. हे सर्व कृत्य करण्याआधी त्याने पालकांना एक व्हिडीओ (Video) पाठवत आपण हे का करत आहोत? हे सांगितलं होते.
अमोल वाघमारेंनी केला गोळीबार
पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळीबार केला होता. ते मुलांना ओलीस ठेवलेल्या ठिकाणी मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता त्यांनी डक एरीयातून बाथरूम मध्ये प्रवेश करत रोहित आर्यवर गोळी झाडली.
व्हिडीओमध्ये रोहित काय म्हणाला होता?
रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं होता. त्यामध्ये त्याने “मी रोहित आर्य आहे, आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आहे आणि याठिकाणी काही मुलांना ओलीस ठेवत आहे. माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या खूप साध्या मागण्या आहेत, नैतिक मागण्या आहेत आणि काही प्रश्न आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि जर त्यांच्या उत्तरांच्या उत्तरात मला काही प्रश्न असतील तर मी त्यांनाही विचारू इच्छितो, पण मला ही उत्तरे हवी आहेत, दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी खूप पैसे मागत नाही आणि मी कोणतीही अनैतिक मागणी करत नाही. मी योजनेचा भाग म्हणून मुलांना ओलीस ठेवले आहे. जर मला थोडीशीही चिथावणी दिली गेली तर मी या जागेला (स्टुडिओला) आग लावीन. आत्महत्या करण्याऐवजी मी ही योजना आखली आहे. मला चिथावू नका, नाहीतर मी मुलांना हानी पोहोचवणारी पावले उचलेलं, असे तो म्हणाला होता.
रोहित आर्य नेमका कोण आहे?
रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. त्याने पीएससी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे दोन कोटी रुपये सरकारने थकवल्याचा आरोप केला होता. मागील सरकारमध्ये दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर रोहित आर्यने उपोषण देखील केले होते. त्यामुळे तेव्हा तो चर्चेत आला होता.




