Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यासिनेट निवडणुका स्थगित झाल्याने ठाकरे बंधू संतापले! आदित्यंचा CM शिंदेंवर निशाणा तर...

सिनेट निवडणुका स्थगित झाल्याने ठाकरे बंधू संतापले! आदित्यंचा CM शिंदेंवर निशाणा तर अमित ठाकरेंचं राज्यपालांना खोचक पत्र

मुंबई | Mumbai

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक विद्यापीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते.

- Advertisement -

मात्र, अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केल्याने विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांमधून संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ही निवडणूक युवासेना मोठ्या फरकाने जिंकणार होती, म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी निवडणूक स्थगित केली, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी तर थेट राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी पहाटेचा मुहूर्त निश्चित केला नाही, याबद्दल आपले आभारी आहोत, असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी लगावला आहे.

अमित ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं

दि. १८ ऑगस्ट २०२३

मा. श्री. रमेश बैस राज्यपाल, महाराष्ट्र राज्य. कुलपती, मुंबई विद्यापीठ.

यांसी सविनय जय महाराष्ट्र!

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार दि. १८ ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते. मात्र केवळ १२ तास आधी, काल रात्री ११च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही.

आपल्याला माहितच आहे की, राजकीय- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिकाऱ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे ९५ हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे- “विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?”

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने ‘रातोरात’ रद्द करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी.

सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार!

धन्यवाद.

आपला नम्र, अमित ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

तसेच आदित्य ठाकरे यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार जर का इतक्या छोट्या निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नसेल तर त्यांच्यात काय दम आहे? असा संतापजनक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काल रात्री 10.30-11 च्या सुमारास मुंबई विद्यापीठाचे एक परिपत्रक निघाले. यामध्ये सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण हे का आणि कोणत्या कारणामुळे करण्यात आले, याबाबतची कोणतीही माहिती नाही. पण जेव्हा आम्ही 2017 मध्ये सिनेटच्या निवडणुका लढलो होतो तेव्हा 10 पैकी 10 जागांवर जिंकल्या होत्या. तेव्हा आमचा विजय हा चांगल्या मताधिक्याने झाला होता. मागच्या वर्षी या निवडणुका याच कालावधीत अपेक्षित होत्या, पण त्या झाल्या नाहीत आणि आता ज्यावेळी निवडणूक कार्यक्रम पूर्ण जाहीर झाला. मतदारांची नोंदणी पूर्ण झाली तेव्हा स्थगिती आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केले. साधारणपणे सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकांसाठी नोंदणी केली होती. हे सगळे पदवीधर मतदार होते. मग नेमके असे झाले काय की काल (ता. 17 ऑगस्ट) रात्री ही बैठक घेतली आणि ही निवडणूक स्थगित झाली. याबाबतचा पहिला प्रश्न म्हणजे जसे मी सांगितले की काय घडले अचानक, की निवडणूक कार्यक्रम पूर्ण जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक स्थगित झाली. दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या पत्रकात लिहिलेले आहे की बैठकीनुसार, मग ती बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? कोणाच्या घरी झाली? कोण कोण होते त्या बैठकीमध्ये? बैठकीचे काही मिनिट्स आहेत का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. हे परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्री हे निवडणुकांना घाबरलेले आहेत. एक कुटुंब, दोन पक्ष यांच्याकडून फोडण्यात आले आहेत. महाशक्ती स्थापन केली. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री किती आणि काय? त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाहीत. किती कोणासोबत आहेत? हे सुद्धा कोणाला माहिती नाही. पण हे सगळं होऊन महाशक्ती त्यांच्यासोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंधे आणि भाजप सरकार घेऊ शकत नसतील ते डरपोक असतील. घाबरत असतील तर मग काय उपयोग आहे. त्यांच्यामध्ये नेमका काय दम आहे, हे दिसून आले आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या