मुंबई । Mumbai
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात प्राण गमवाव्या लागलेल्या पिंकी माळी यांची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. पिंकी या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केरकट तहसीलमधील भैंसा गावच्या रहिवासी होत्या. त्यांचे वडील शिवकुमार माळी हे कुटुंबासह मुंबईत वास्तव्यास आहेत. अत्यंत कष्टातून पिंकी यांनी विमान वाहतूक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे, अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गावी पोहोचताच जौनपूर आणि मुंबईत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते. लँडिंगच्या प्रक्रियेत असताना अचानक विमानाचा तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे तोल गेला आणि विमान कोसळले. ही धडक इतकी भीषण होती की, जमिनीवर आदळताच विमानाने पेट घेतला. स्थानिक प्रशासनाने आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु आग आणि धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की विमानातील कोणालाही वाचवता आले नाही.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. बारामती, जो त्यांचा बालेकिल्ला समजला जातो, तिथेच हा अपघात झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी बारामतीकडे रवाना झाले आहेत. विमानाचा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की हवामानातील बदलामुळे, याचा सखोल तपास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) केला जाण्याची शक्यता आहे.




