नाशिक । प्रतिनिधी Nashik
मविप्र संस्थेत ( MVP ) पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अनागोंदी कारभारविरोधात सभासद जागरूक झाले असून प्रत्येकाच्या मनात परिवर्तन करण्याचे ध्येय स्पष्ट आहे. विरोधकांच्या कितीही भूलथापा येऊ द्या,संस्थेचा सभासद हा सजग असून रविवारी ते मतात रूपांतर होणार असल्याचा विश्वास अॅड.नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackeray) यांनी व्यक्त केला.
नाशिक ग्रामीण दौर्याप्रसंगी आडगाव मखमलाबाद गिरणारे देवळाली कॅम्प येथे परिवर्तन पॅनलचे ( Parivartan Panel ) मेळावे झाले. ठाकरे म्हणाले, संस्थेमध्ये ज्या ज्या वेळी चुकीच्या गोष्टी घडत गेल्या त्या त्यावेळी मी त्याला ठाम विरोध केला. परंतु, विरोधाला दडपण्यासाठी मी संस्थेविरुद्ध भूमिका घेतो,असे चित्र रंगवण्यात आले.
जिल्हा बाहेरील आणि ज्यांचा संस्थेशी काही संबंध नाही, अशा सभासदांच्या बाबतीत बोललो तर मी नवीन सभासदांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले.परंतु, नवीन सभासद हा डाव जाणून आहेत.ते पवारांच्या भुलतापांना कधीही बळी पडणार नाही.हे सभेतून मिळणारा प्रतिसाद अधोरेखित करणार आहे. खरे तर पवार कुटुंबियांना आपल्या एकाधिकारशहीला तडा जाऊ द्यायचा नाही,हा त्यांनी हट्ट धरलेला असताना सभासदांनीही पवार कुटुंबीयांच्या कारभाराबद्दल व एकूण कार्यपद्धतीचा अनुभव चांगलाच घेतला.केवळ स्वतःचे हीच साधण्याचे काम या परिवाराने केले.
संस्थेची गुनात्मक प्रगती किती झाली यावर सत्ताधार्यांनी आजपर्यंत एक अक्षरही उच्चारलेले नाही.फक्त हजारो स्क्वेअर फिटच्या बिल्डिंग बांधून ठेवल्या. परंतु ,विद्यार्थी संख्या मात्र काहीशे स्क्वेअर फुटा पुरतीच आहे. ही शोकांतिका म्हणावी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ज्या सभासदांनी संस्थेसाठी बलिदान दिले त्यांच्या वारसांना साधे सभासदत्वही यांना देता आले नाही.
संस्थेचे खरे मालक हे सभासद असल्याचे ते विसरले असून जणू काही त्यांच्या घरची संस्था आहे, असे त्यांचे हुकूमशाही पद्धतीचे काम सर्वांनीच अनुभवले.त्यांनी सुरू केलेला प्रांतवाद आता तालुका पुरता मर्यादित राहिला नसून संस्था नाशिक जिल्ह्याची ठेवायची की कोपरगावची बनवायची यावर खरा विषय येऊन थांबला आहे.त्यामुळे रविवारी होणार्या निवडणुकीसाठी सभासदांनी परिवर्तन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन ठाकरेंनी केले.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी संस्थेत सुरू असलेली एकाधिकारशाही मोडून लोकशाही आणण्याचे आवाहन करत सरचिटणीस आणि त्यांच्या कुटुंबियांची असलेली बनवेगिरी संस्थेतील कारभारामधील गोलमाल,तालुक्यात संभ्रमावस्था निर्माण करण्याचा डाव,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अनुदान,प्रामाणिक सेवकांचे हाल आदी विषयांवर तोफ डागत विद्यमान कार्यकारी मंडळावर निशाणा साधला.