पारनेर |प्रतिनिधी| Parner
राज्यातील शेतकरी संकटात सापडला असल्याने कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून योग्य भाव द्यावा, अशी मागणी आ. निलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान केली. तसेच तालुक्यातील टाकळीढोकेश्वर पोलीस ठाणे मंजूर झाले असून ते तातडीने सुरू करून दुर्गम भागातील जनतेची सोय करावी, अशीही मागणी आ. लंके यांनी केली.
टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाणे तातडीने सुरू करावे, अशी मागणी टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच अरुणा खिलारी, लंके प्रतिष्ठानचे नेते बाळासाहेब खिलारी यांनी केली होती. त्यानुसार हे पोलीस ठाणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी लक्षवेधी दरम्यान आ. लंके यांनी केली. विधानसभा अधिवेशनात अध्यक्षांनी अडीच ते तीन मिनीटांचा वेळ लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी आ. लंके यांना दिला होता.
यावेळी आ. लंके म्हणाले, सध्या राज्यामध्ये महागाईचा आगडोंब उसळला असून महागाईचे चटके शेतकर्यांना बसत आहेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांना कांदा उत्पन्नासाठी प्रति एकरी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येत असून जास्तीत जास्त भाव देऊन कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून सुरू करावी. पारनेर मतदारसंघातून नगर-मनमाड रोड हा शिर्डी मार्गे जात असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे आ. लंके यांनी निदर्शनास आणून दिले.