Monday, October 28, 2024
Homeनगरनगर शहर शिवसेना करणार बंडखोरी

नगर शहर शिवसेना करणार बंडखोरी

मंगळवारी प्रा. गाडे, फुलसौंदर दाखल करणार अर्ज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावून राष्ट्रवादीचे निलेश लंकेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तरीही विधानसभेला शिवसेनेला उमेदवारी नाकारली. यामुळे शहरात पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून, सर्वांनी एकत्रितपणे बंडखोरी करत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व माजी महापौर भगवान फुलसौंदर हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.

- Advertisement -

गेली 35 वर्षे सलग नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढविणार्‍या शिवसेनेऐवजी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी देण्यात आल्याने आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. सेनेच्या ठाकरे गटाची रविवारी सायंकाळी नगरमध्ये बैठक पार पडली. यात नगरची जागा हक्काची असतानाही सोडण्यात आल्याने खा. संजय राऊत यांच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी असंतोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली. शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असतानाही जागा सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

यातून पक्षाचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे गटाने नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत लढवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पक्षाने फेरविचार न केल्यास प्रा. गाडे व फुलसौंदर मंगळवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर दोघांपैकी एकाच्या नावावर निर्णय होऊन ठाकरे गट अपक्ष उमेदवारी करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. बैठकीस विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्यांदा नगरमधून शिवसेना गायब
पहिल्यांदाच मागील 35 वर्षांमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर शहरासाठी शिवसेनेला उमेदवारी मिळालेली नाही. या निर्णयामुळे संपूर्ण शहरातील शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक आणि साधा नगरकर अस्वस्थ झालेले आहेत. माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा. गाडे आणि असंख्य शिवसैनिकांनी घडवलेली शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. नगरकर शिवसैनिक आणि नागरिकांच्या या भावना लक्षात घेऊन सर्व शिवसैनिक आणि नगरकरांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या