Friday, January 17, 2025
Homeनगरनगर-मनमाड मार्ग दुरुस्त करून वाहतूक योग्य करा

नगर-मनमाड मार्ग दुरुस्त करून वाहतूक योग्य करा

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

अहमदनगर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 नगर ते मनमाड वरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तत्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना आणि संबंधित यंत्रणांना दिले.

- Advertisement -

अहमदनगर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग 160 ( नगर – मनमाड) वरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करण्याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महासंचालक (रस्ते) आणि प्रकल्प संचालक डी. एस. झोडगे, साईट अभियंता दिग्विजय पाटणकर, साईट अभियंता ओ.जी. अनेराव, ऑथोरिटी इंजिनिअर महेश मिश्रा, बी.पी.सी.एलचे मनोज शिंगोटे, रुद्रानी इन्फ्राचे विवेक देशपांडे मनिषा कन्स्ट्रक्शनचे जी.एल.माने यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग 160 (नगर – मनमाड) वरील सावळी विहीर ते नगर बायपास विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र कंत्राटदारांच्या काम दिरंगाईमुळे सदर रस्त्याचे काम रेंगाळले होते. त्यातच गॅस वाहिन्यांसाठी खोदकाम करून तेथील रस्त्यावर माती आल्याने दुहेरी वाहतुकीसाठीचा रस्ता केवळ एकल मार्ग झाला आहे. वाहतूक कोंडी आणि अतिशय संथगतीने सुरू असलेल्या वाहतूकीमुळे जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आजच्या बैठकीत याविषयी सखोल चर्चा झाली आणि येणार्‍या अडचणी सोडविण्यात येतील असे विखे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग 160 (नगर – मनमाड) वरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी बैठकीत दिले. यामुळे येत्या काळात जनतेला वाहतुकीसाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या