अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर, शिर्डी, संगमनेरमधील दाट वस्ती, शाळा, बाजारपेठेच्या ठिकाणी भूमिगत विद्यूत वाहिन्यांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या क्षमता संवर्धनाची कामे करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, त्यासाठी सर्व जुन्या उपकेंद्रांचे आणि वाहिन्यांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात यावे. अधिकार्यांनी संवेदनशीलपणे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विद्युत वितरण कंपनीचे प्रलंबित प्रस्ताव समाविष्ट व्हावे यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवावे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करताना अनियमिततेच्या तक्रारी आहेत. सध्याच्या उपकेंद्राचे सक्षमीकरण आणि नवे प्रस्तावित उपकेंद्रांची कामे झाल्यास विजेची समस्या दूर करता येईल. नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी कर्मचार्यांनाही जनतेशी संबंधित योजना व कामांची माहिती द्यावी. विद्युत उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी आणि त्यानुसार कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी. गतवर्षी जिल्ह्याला विद्युत रोहित्रासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला होता. या निधीचा उपयोग करून नागरिकांच्या समस्या वेळेत दूर होतील याची दक्षता घ्यावी.
विद्युत देयकांबाबत तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेचा अधिक उपयोग करावा. अशा तक्रारींबाबत कालमर्यादेत कार्यवाही करावी. घराचा आकार, एकूण वीज वापर लक्षात घेऊन त्यापेक्षा अधिकचे देयक येणार नाही याबाबत उपाय योजावेत. अहिल्यानगर, शिर्डी, संगमनेरमधील दाट वस्ती, शाळा, बाजारपेठेच्या ठिकाणी भूमिगत विद्यूत वाहिन्यांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करू. अतिक्रमण काढलेल्या भागातील विद्युत खांब स्थलांतरित करण्याबाबत माहिती घेण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची योग्य माहिती विविध माध्यमाद्वारे नागरिकांना देण्यात यावी. प्रधानमंत्री कुसुम-बी मागेल त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत सर्वाधिक अर्ज जिल्ह्यातून असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 2 हजार 356 मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असून त्यासाठी 11 हजार 786 एकर आवश्यक आहे. त्यापैकी 3 हजार 392 एकर क्षेत्र मंजूर झाले आहे. त्याद्वारे 508 मेगावॉट वीज निर्मिती होऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सौर विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
एसटी महामंडळाच्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी प्रकाश राहील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा. स्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची देखभाल आणि स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करावी. बसस्थानकात प्रवाशांना तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करावा. बस स्थानकाचे काम करतांना नावीन्यपूर्ण कल्पना अंमलात आणाव्या, प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासोबत महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या स्थानकाचे काम करतांना बीओटी तत्वावर सुधारित प्रस्ताव तयार करावा. बसस्थानक परिसरात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. चालक आणि वाहकांना विश्रांतीसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा.जिल्हा मुख्यालय ते तालुका मुख्यालय प्रायोगिक तत्वावर विना थांबा गाड्या सोडाव्यात. ग्रामीण भागासाठी जनता गाड्या सुरू ठेवाव्यात. एसटी बसेसमध्ये स्वच्छता ठेवावी. नवीन एसटी बसेसचा प्रस्ताव सादर करावा. बस थांब्यावर दिलेल्या अटी शर्तीचे पालन होण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा ठिकाणी असलेल्या सुविधांचे फलक आणि तक्रारीसाठी क्रमांक प्रदर्शित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.