नागपूर | Nagpur
औरंगजेबाची कबर (Aurangzeb’s Tomb) हटवण्याच्या मागणीवरून नागपुरात (Nagpur) सोमवारी रात्री (दि. १७ मार्च) रोजी मोठा तणाव निर्माण होऊन दोन गटात दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या वादानंतर नागपूर पोलीस (Nagpur Police) ॲक्शन मोडमध्ये आले असून महाल भागात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करुन आतापर्यंत ६० हून अधिक जणांना अटक केली आहे.
तर परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, महाल भागात झालेल्या वादानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर (Police) दगडफेक करण्यात आली होती.सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. याचबरोबर सायबर पोलिसांकडून देखील आतापर्यंत १८०० सोशल मिडिया अकाऊंटसची तपासणी करण्यात आली आहे.
बाहेर न पडण्याचे आदेश, संचारबंदी लागू असलेल्या भागातील शाळा बंद
पोलिसांनी ज्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या भागात फिरून बाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. तसेच ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्या भागातील शाळा बंद करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?
“नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे”, असे फडणवीस म्हणाले.